Saint Eknath - संत एकनाथ संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. कोणताही उच्चनीच भेदभाव माणू नका, असा त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरीबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही, तर मुक्या प्राण्यांवरदेखील त्यांनी दया केली. प्राणिमात्रांवर दया करा, असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडेतिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली.
संबंधित काही पोस्ट्स
0 Comments