Saint Tukaram - संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील अडल्यानडल्यांना कर्ज देत; पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत. आषाढी-कार्तिकीला पंढरीला जात. कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करत - 'जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले ,तोची साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा |' हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जयजयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला 'ग्यानबा- तुकाराम' हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच 'ग्यानबा' असे म्हणतात. 'तुकारामगाथा' आजही घरोघरी वाचली जाते.
0 Comments