Historical Stream

Historical Stream

वेरुळचे भोसले

 वेरुळचे भोसले 

  • वेरुळचे भोसले: वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ. वेरुळच्या बाबाजीराजे भोसल्यांची हि मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती.  मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहाने स्वारी केली होती. त्या वेळी दौलताबाद हि निजामशाहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबादजवळील वेरुळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशाहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशाहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली.  भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई या मालोजीराजांची पत्नी. त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. या उभयतांना दोन मुले होती. एकाचे नाव शहाजी आणि दुसर्याचे नाव शरीफजी. शहाजी पाच वर्षांचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठ्या सुलक्षणी होत्या. जिजाबाईंसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लाखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशाहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाच्या लक्ष्मी झाल्या.
  • शहाजीराजे: निजामशाहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशाहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशाहाही त्याला मिळाला, तेव्हा  निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे हि प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी कि खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयंतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशाहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब देवून त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बर्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.
संबंधित काही पोस्ट्स    

Post a Comment

0 Comments